हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळ अखेर ओरिसात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धडकलं. या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका होता. त्यामुळे ओडिसासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार ते रविवार या कालावधीत हा पाऊस होऊ शकतो.
‘यास’ चक्रीवादळ बुधवारी सकाळीच ओरिसा राज्यातील बालासोर शहरात धडकलं. सकाळी नऊ ते दुपारी बारा तीस पर्यंत लॅंडफॉल ची प्रक्रिया सुरू होती. या वादळाचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर इतका आहे. वादळाचा परीघ वाढल्याने बाजूच्या चारही राज्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे. ओरिसातील सर्व जिल्ह्यांना या वादळाने कवेत घेतले आहे. अजून दोन दिवस या भागात वादळाचा तांडव सुरू राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनची जोरदार आगेकूच
एकीकडे ‘यास’चे तांडव सुरू असताना दुसरीकडे अंदमानातून मान्सून जोरदार आगेकूच करत आहे. तो 48 तासांपेक्षा कमी कालावधीत बंगालच्या उपसागरात दाखल होईल. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
या वादळामुळे राज्यात 28 ते 30 मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, जिल्ह्यात हा पाऊस होईल.