हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसामुळे राज्यभरात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, शिवाय रब्बी पिकांची लागवडही रखडली. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साठल्यामुळे आणि वाफसा नसल्यामुळे हरभरा, करडई, ज्वारी या रब्बी पिकांची लागवड खोळंबली आहे. अशा परिस्थितीत हरभरा लागवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील हरभरा पैदासकार डॉ. अर्चना थोरात यांनी पुढील माहिती दिली आहे.
हरभऱ्याची पेरणी साधारणपने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत केली जाते. त्यामुळे हरभरा पेरणीचा कालावधी उलटलेला नाही. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते परंतु पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रावर ही वेळ साधता आलेली नाही. अशा ठिकाणी कमी कालावधीच्या हरभरा जातींची निवड करावी. या हंगामात पावसाळा लांबल्यामुळे त्याचा फायदा कोरडवाहू लागवडीसाठी होऊ शकतो.
कधी कराल पेरणी ?
३० नोव्हेंबर पर्यंत पेरणी करायची असल्यास म्हणजेच उशीरा पेऱणीसाठी राजविजय २०२ व २०४ या जातींची निवड करावी. या दोन जाती कमी कालावधीच्या आणि बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही क्षेत्रासाठी महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आल्या आहेत.
या जातींची करा लागवड
कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभऱ्यासाठी विजय, दिग्विजय, राजविजय-२०२, राजविजय-२०४, जाकी, साकी, आयसीसीव्ही-१०, पीकेव्ही कांचन, फुले विक्रम, बीडीएनजी-७९७, फुले विक्रांत, विश्वराज या देशी किंवा सुधारित वाणांची शिफारस करण्यात आली आहे.