हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांचे कोरोनाने जीव गेला. आता केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांना सुद्धा साथीच्या रोगाने विळखा घातला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घटसर्प, थायरेलेलीस सदृश्य साथीच्या आजाराने थैमान घातले असून त्यामुळे १५० जनावरांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे साथीच्या रोगाने दुभती जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट ओढवले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यात तवलवाडी, वाळुंज परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी मुक्त गायगोठा पद्धतीनं आधुनिक दुग्धव्यवसाय करतात. गेल्या पाच सहा दिवसांपासून तवलवाडी परिसरात घटसर्प, थायरेलेलीस या साथीच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यानंतर काही वेळातच गाईंचे मृत्यु होत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी आरोग्यविषयक सर्वेक्षण केलं. तालुक्यातील तवलवाडी वाळुंज परिसरात 70 दुभत्या गाई आणि 80 वासरं मृत्यूमुखी पडली आहेत. यामुळं भीतीचं वातावरण आहे.
नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले
यासंदर्भात औरंगाबाद विभागीय पशू संवर्धन विभागाची टीम आष्टीत दाखल झाली आहे. मृत गायींचं शवविच्छेदन करून शरीरातील काही भागांचे नमुने भोपळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन प्रभारी डॉ. विनायक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची धस यांची मागणी
तवलवाडी गावामध्ये 4 ते 5 दिवसांत तब्बल 60 संकरीत गाई आणि 80 च्या आसपास वासरं घटसर्प सदृश्य आजारानं दगावली आहेत. गाईंच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधलं जात आहे. आधीच दुधाच्या घसरलेल्या दराने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीत कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकर्यांवर पुन्हा एकदा संकट घोगावत आहे. त्यामुळं पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी सुरेश धस करत आहेत.