हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसात झालेल्या वातावरणातील बदलामुळे केवळ शेतकऱ्यांच्या पिकांचे नाही तर पशुपालकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गारठ्यामुळे अधिकच्या प्रमाणात मेंढ्या दगावलेल्या आहेत पशूनुसार पशूपालकांना मदत केली जाणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. बारामती तालुक्यातील सुपा कुतळवाडी येथे दगावलेल्या जनावरांची त्यांनी पाहणी करुन ही माहिती सांगितली.
असे असणार आहे मदतीचे स्वरुप
ज्यामध्ये 1 डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे दगावली आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या आहे ती मेंढ्यांची. अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी-मेंढी करता 4 हजार रुपये, गायी करीता प्रत्येकी 40 हजार रुपये, बैला करता 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले. पशूसंवर्धन विभागाने पंचनामे पूर्ण केले असून प्रक्रिया पूर्ण होतात ही मदत तातडीने जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
बारामती तालुक्यातील नुकसान पाहणी
अवकाळीमुळे शेतीपिकाचे तर नुकसान झालेच आहे पण शेतकऱ्यांचा जोडव्यवसायही धोक्यात आला आहे. कारण अतिवृष्टीने जेवढे पशूधनाचे नुकसान झाले नाही तेवढे या अवकाळी पावसामुळे झाले आहे. पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बारामती तालुक्यातील दगावलेल्या पशूधनाचा आढावा घेतला शेतकऱ्यांचे हाल पाहताच त्यांनी या मदतीची घोषणा केली आहे. जनावरे दगावताच आर्थिक मदतीची मागणी या पशूपालकांकडून करण्यात आली होती. अखेर मदतीची घोषणा झाली आहे आता प्रतिक्षा आहे ती अंमलबजावणीची.
सर्वाधिक नुकसान पुणे जिल्ह्यात
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झळ ही जुन्नर तालुक्यातील मेंढपाळांना बसलेली आहे. कारण या एकाच तालुक्यातील 650 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यानंतर आंबेगाव तालुक्यात 366, शिरुर तालुक्यात 341, पुरंदर तालुक्यात 131, खेड तालुक्यात 84, हवेलीत 18, दौंडमध्ये 24 , मावळ तालुक्यात 93, तर बारामती तालुक्यात 70 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पशूसंवर्धन विभागाकडे झाली आहे.एवढेच नाही तर जिल्ह्यात 600 मेंढ्या ह्या वातावरणामुळे गंभीर जखमी आहेत. या 600 पैकी एकट्या जुन्नर तालुक्यात 300 मेंढ्या ह्या जखमी झालेल्या आहेत. यामध्ये अणखीन वाढ होऊ शकते असेही यावेळी भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
संदर्भ : टीव्ही ९