हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्राच्या ईशान्य भागात सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे ही स्थिती फारशी सक्रिय नसल्याने या भागाकडून येणारे वारे कमकुवत आहे त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या राज्यातील बहुतांशी भागात पावसासाठी पोषक स्थिती आहे. अनेक ठिकाणी उघडीप असली तरी राज्यात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. पावसामुळे हवेत गारवा तयार होत असल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे गुरुवारी दिनांक 24 रोजी सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे 34 .८ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. काही भागात होत असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे विदर्भात कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं गेलं मराठवाड्यातही तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस तर मध्य महाराष्ट्रात २० ते 34 तर कोकणात 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
मान्सूनचे वारे कमकुवत
मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत उत्तर पश्चिम भारत महाराष्ट्रासह दक्षिण यातील बहुतांश राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसल्याचं पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तर पूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वाऱ्याचा प्रवाह फारसा सक्रिय नसल्यामुळे मान्सूनचा प्रवास अडकला आहे. येत्या काळात पोषक वातावरण झाल्यास उत्तर भारतात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
राज्यात शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या भागात तर शनिवारी भंडारा, नागपूर गडचिरोली, चंद्रपूर आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे