हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक होत आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपण शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चेसाठी तयार आहोत आणि त्यांनी चर्चेसाठी पुढे येऊन हे आंदोलन स्थगित करावं असं म्हटलं आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टीकैत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर, तसंच इतर नेत्यांनी माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेतली. याबाबतची माहिती खासदार शरद पवार यांनी ट्विट करून दिली आहे.
मा. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले.@CMOMaharashtra pic.twitter.com/fjsBKMk7CO
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 29, 2021
या बैठकी दरम्यान शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मत मांडलं तसंच राज्य शासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला. तर मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन शरद पवार यांनी त्यांना दिले.
राजू शेट्टी यांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राच्या या नवीन शेती कायद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली. अनेकदा पत्रव्यवहारही केला मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आलं नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली.