सद्यस्थितीत डाळींब बागेची तसेच इतर पिकांची कशी घ्याल काळजी ? वाचा कृषी सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 13 मे रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

उन्हाळी सोयाबीन : काढणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी व मळणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी भुईमूग : वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

ऊस : ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

हळद : हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी : सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

चिकू : चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

आंबा : काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा तसेच काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून काढणी केलेल्या आंबा फळांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

डाळिंब : आंबे बहार डाळींब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

भाजीपाला

भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी. भेंडी पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रीड 20% एसपी 1.5 ग्रॅम किंवा डायमिथोएट 30% ईसी 23 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल 2 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील नागअळीच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलीप्रोल 10.26% ओडी 18 मिली किंवा थायामिथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फुलशेती

फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.

तुती रेशीम उद्योग

किटक संगोपन गृहालगत 10 फुट अंतरावर चारही बाजूने तुती वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी. त्यामूळे 5 अं. से. तापमान कमी मदत मिळते. कच्च्या शेडनेट गृहातील तापमान 28 अं.से. च्यावर जाता कामा नये. हिवाळयात 20 अं.से. च्या खाली व उन्हाळयात 35 अं.से. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत. तुती पाने खाण्याची ‍क्रिया मंदावते. किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास बळी पडतात. त्यामूळे उन्हाळयात 3 ते 4 वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व रॅकवर निळी नायलॉन जाळी किंवा निळी पॉलीथीन पट्टी आच्छादन करावे. आतील चारही बाजूने 22.5X 15 सेंमी लांबी खोलीची नाली असावी. वरच्या बाजूस सिमेंट पत्रे किंवा बेंगलोर टाईल्स टाकून त्यावर कोल्ड गार्ड पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान 5 ते 7 अं.से ने कमी होते.

Leave a Comment

error: Content is protected !!