हॅलो कृषी ऑनलाईन । वाशीम येथे आज कापूस खरेदी केंद्रासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील दिग्रस चौकात परिवर्तन शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असूनही अद्याप येथे कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधले जावे असा उद्देश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तालुक्यात खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने येथील कापूस उत्पादकांना नुकसान सोसावे लागते आहे. येथील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी शेजारच्या मंगरूळपीर किंवा कारंजा तालुक्यातील केंद्रावर घेवून जावा लागतो आहे. त्यामुळे येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र असावे अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. या तालुक्यातील जवळपास १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते असे असूनही येथे खरेदी केंद्र नाही, म्हणून वारंवार येथे कापूस खरेदी केंद्र करावे अशी मागणी केली जात आहे.
मात्र सतत मागणी करूनही शासन याकडे दुर्लक्ष करते आहे. परिवर्तन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या सदस्यांसोबत कापूस उत्पादक शेतकरी या आंदोलनाला उपस्थित होते.