हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा पातळींवर होणार आहे. कृषी संशोधन संस्था/ विद्यापीठांमध्ये संशोधित तंत्रज्ञान स्वीकार, पिकांच्या सुधारित जातींची लागवड, स्वतः शेतकऱ्यांची प्रयोगशील वृत्ती वाढीला लागावी, पिकांची उत्पादकता आणि एकूण उत्पादन वाढ, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि उत्पादन वाढविणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, नवीन उमेदीने नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील तसेच इतर शेतकरी प्रेरणा/ मार्गदर्शन घेवून आपले उत्पादन वाढवतील या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार इतके बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रु असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस असणार आहे. विभाग पातळीवर प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि १५ हजार अशी बक्षिसे आहेत. तर राज्य पातळीवरील विजेत्यांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. वैयक्तिक शेतकरी या स्पर्धेमध्ये भाग घेवू शकतात.
लाभ घेण्यासाठीचे निकष
१. समाविष्ट पिके: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ ई.
२. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे
३. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एका वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल
४. सर्वसाधारण व आदिवासी शेतकरी सहभाग घेवू शकतात
५. प्रवेश शुल्क: ३०० रु
६. अर्ज करण्याची अंतिम मुदत: ३१ डिसेंबर २०२०
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१. पीक स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज करावा
२. प्रवेश शुल्क अर्ज
३. ७/१२
४. ८-अ चा उतारा
५. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) ई.
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ: www.krishi.maharashtra.gov.in येथे तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क साधता येईल.