हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना एक रकमी एफआर पी मिळावी याकरिता शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. काही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे तर काही कारखान्यांनी नाही. मात्र दत्त इंडियाच्या पाठोपाठ आता दालमिया शुगरने ऊसासाठी एकरकमी 2950 एफआरपी देण्याचा निर्णय घेतला असून आता राजारामबापू, सोनहिरा व हुतात्मा सारख्या कारखान्यांच्या निर्णयाकडे शेतकर्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मोठे कारखाने शेतकर्यांनाएफआरपी पोटी पहिला हाप्ता 2500 दुसरा हाप्ता 300 व तिसर्या हाप्त्यात उर्वरित रक्कम देण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेण्याची शक्यता आहे.
शिराळा तालुक्यातील निनाईदेवी कारखाना चालवायला घेतलेल्या दालमिया शुगरने ऊसदराची दुसरी कोंडी फोडली. एकरकमी एफआरपी 2950 रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याबद्दल कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला.