हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातल्या जवळपास सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. रब्बी हंगामात तरी काहीतरी हाती लागेल या आशेने शेतकरी कामाला लागला होता. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. काल सोलापुरातल्या अनेक भागात मोठा पाऊस झाला. करमाळा तालुक्यालाही पावसाने झोडपले यात शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतात पाणी साचले आहे.
रब्बी पिकांचे नुकसान
करमाळा तालुक्यात दोन दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात सर्वत्र पाऊस झाला आहे. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जातेगावमध्ये तर ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झाला आहे. पावसाळ्यात देखील एवढा पाऊस झाला नव्हता तेव्हा रात्री पाऊस झाला आहे.येथील शेतकरी सुरेश पाटील म्हणाले, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पाऊस सुरु झाला. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान हा पाऊस बंद झाला. या पावसाने शेतात पाणी साचले असून कांदा पूर्ण पाण्यात गेला आहे. हरभरा, गहू याचे नुकसान झाले आहे. ज्वारीचे पीक झोपले आहे.
ऊस अडकला शेतात
या अवकाळी पावसामुळे बिटरगावश्री येथील शेतकरी प्रवीण मुरूमकर यांचा ऊस शेतात अडकला आहे. पाऊस येईच्या आधी शेतात तीन दिवसांपूर्वी तोडून ठेवलेला ऊस कसा काढायचा हा प्रश्न निर्माण झाला असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सरपडोह येथेही जोरदार पाऊस झाला आहे.