हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या वातावरणाचा फटका इतर पिकांप्रमाणेच केळी पिकालाही बसला आहे. त्यामुळे खानदेशासह मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत होता. वातावरणाचा परिणाम होऊन केळीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जालण्यात शेतकऱ्यांनी केळीच्या बाग उध्वस्त केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर थंडीमुळे केळीच्या मागणीत घट झाली . मात्र आता थंडी ओसरल्यामुळे केळीच्या मागणीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.
केळीवर थंडीचा परिणाम
मधल्या काही दिवसात राज्यात मोठी थंडी पडल्याने ग्राहकांनी केळीकडे पाठ फिरवली. मात्र याचवेळी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत विक्री करण्याचे टाळले. आता वातावरणात बदल होतो आहे. थंडी कमी झाली आहे. तशी बाजारात आवक देखील वाढली आहे. आता केळीला किमान ४३०रुपये ते ८५० दर प्रतिक्विंटल मिळतो आहे. जळगावमध्ये दररोज 16 टन केळीची आवक सुरु आहे. गेल्या 4 दिवसांपासून आवक वाढली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या खानदेशातील केळीला दिल्ली, पंजाब, काश्मीर या उत्तरेकडील राज्यातून मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे दरात काही प्रमाणात का होईना सुधारणा होत आहे. चांगल्या प्रतीच्या केळींना प्रती क्विंटल 850 रुपयांपर्यंतचा दर आहे. शिवाय असेच दर राहिले तर लवकरच परदेशातही निर्यात केली जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.