हॅलो कृषी ऑनलाईन । यावर्षी तसेच मागच्या २-३ वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकांमध्ये गुंतवलेली रक्कम उत्पादनातून न मिळाल्याने त्यांना पुढील पीक घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परभणी जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी ४५१ कोटी ८७ लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता हंगाम संपत आला तरी ५०% देखील कर्ज वाटप झाले नाही आहे. बँकांनी २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख इतकेच अर्थात एकूण उद्दिष्टाच्या ३५.५७% इतकेच कर्ज वाटप केले आहे.
शेतकऱ्यांना सतत अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. ज्यामुळे पिकांचे त्याच्या डोळ्यासमोर नुकसान होते आहे आणि पिकांसाठी खर्च केलेल्या पैशांचेही उत्पन्न त्यांना मिळत नाही आहे. मात्र तरीही पुन्हा पीक घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही. पण अशावेळी शेतकरी हा बहुतांश प्रमाणात बँकांवर अवलंबून असतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसानीस सामोरे जावे लागले होते. म्हणून रबी हंगामात शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. ते देखील प्रशासनाने पूर्ण केले नाही आहे.
२०२०-२१ या खरीप हंगामासाठी देखील प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र त्यावेळीही बँकांनी शेतकऱ्यांना अडचण असतानाही पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले होते. १ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना १ हजार ९२ कोटी ४० लाख एवढे म्हणजे ६६% इतके उद्दिष्ट बँकांनी पूर्ण केले होते. जिल्ह्यात खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामात गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही आहे.