हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी खरीप हंगामात मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला. त्याचा खरिपाच्या पिकांना फटका बसला असला तरी रब्बीच्या पिकांना मात्र त्याचा फायदा होणार आहे. यंदा झालेला पाणी साठा लक्षात घेता जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी दिले जाणार आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्युसेकने सुरू करण्यात आलेल्या विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. यात तीन जिल्ह्यातील 1 लाख 41 हजार हेक्टरवरील पिकांना याचा फायदा होणार आहे.
रब्बी हंगामातील पेरण्या ह्या सुरु आहेत. तर पहिल्या टप्प्यात ज्वारी, हरभरा, मका यांचा पेरा झाला आहे. पिकांची उगवण होताच आता धरणातील पाणी सोडण्यात आल्याने पाणी प्रश्न हा मिटलेला आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामात हरभरा या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. याच बरोबर या तीन जिल्ह्यातील गहू, बाजरी, ज्वारी, तूर, हरभरा, मका, ऊस या पिकांना पाणी देता येणार आहे. तब्बल 122 किलोमिटरच्या क्षेत्रापर्यंत हा पाणीपुरवठा केला जात आहे.