हॅलो कृषी ऑनलाईन : तासगाव शहरासह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस पडत आहेे. त्यातच गुरुवार पासून ढगाळ वातावरणाने आगाप फळ छाटनी केलेल्या तालुक्यातील द्राक्षबागांवर डाऊनी नामक रोगाचा हल्ला होण्याची तर पावसाच्या पाण्याने घडकुज होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत. बिघडलेल्या हवामानामुळे मात्र औषध कंपन्याना सुगीचे दिवस आले आहेत. तर काढणीला आलेल्या खरीपाच नुकसान होणार आहे.
द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर तालुक्यात द्राक्ष शेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश विदेशात पाठवला जातो. गेली तीन वर्षे चक्रीवादळ व पावसाने तालुक्यात थैमान घातले होते. विरळणी, फ्लावरिंग स्टेजला पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे डाऊनी रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर फैलाव झाला. पावसाने द्राक्षाचे घड कुजून गेले तर डाऊनी रोगाच्या फैलावाने हजारो हेकटर क्षेत्र या रोगास बळी पडले होते.
यामुळे शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले होते. सध्या आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांची पोंगा ,विरळनी तर काही ठिकाणी डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डाऊणीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खराब हवामान व पावसाने द्राक्ष बागायतदार चांगलाच गारठला आहे. डाऊनी रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्याची औषधे शेतकरी खरेदी करताना दिसत आहे. मात्र छाटणी न झालेल्या द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने काडीतील घड जिरण्याचा धोका आहे. सोमवार पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.