हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडतो आहे. यातच कोल्हापूर, रायगड, कोकणातील काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या सारख्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
2019 साली अशाच स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. आता तशीच काहीशी परिस्थिती कोल्हापूर मध्ये नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस आला आहे. यामुळे पन्हाळा रोड हा पूर्णपणे खचला आहे पावसाचा जोर वाढतच चालल्याने परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनली आहे.
दरम्यान 2019 चा महापूरावेळी देखील पन्हाळा ज्योतिबा आणि जिल्ह्यातील अन्य रस्ते खचले होते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत होता. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वेगानं वाढ झाल्याने रेडेडोह फुटला आहे. जोरदार पावसामुळे पन्हाळा जवळील रस्ता खचला आहे त्यामुळे गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगासह जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणचे मार्ग बंद झाले असून पंचगंगेचे पाणी पातळी सध्या 46. 7 फुटांवरून वाहत आहे.