उत्तर कोकण वगळता राज्यातील इतर भागात अवकाळीचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचे चटके आणि संध्याकाळ नंतर अवकाळी पाऊस अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असून ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या ठिकाणी तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे.

याचा सर्वाधिक धोका मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांना अधिक आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. काल महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आज विदर्भातील काही जिल्हे अवकाळी पावसाच्या हिटलिस्टवर आहेत, पुढील चार-पाच दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे 28 आणि 29 एप्रिल रोजी भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच मंगळवारी आणि बुधवारी सिंधुदुर्ग, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत त्यामुळे दक्षिण भारत सह उत्तरेकडील काही राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूचे दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!