हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात दररोज १००/१५० रुपयांनी वाढ होत होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दराला पुन्हा उतरती कळा लागली आहे. मागील २ दिवसात सोयाबीनचे दर तब्बल ४०० रुपयांनी खाली आले आहेत. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर होत अललेल्या बदलाचा परिणाम थेट बाजार समितीमधील सोयाबीनच्या दरावर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.
दर घटण्यामागे कारणे
–सोयाबीनचे दर हे वाढत होते तर आवक ही मर्यादितच होती. मात्र, सोमवारपासून चित्र बदलू लागले आहे.
–सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये तब्बल 400 रुपयांनी दर हे घसरलेले आहेत.
— सोयापेंडची घटती मागणी
— कोमोडिटी बाजारात झालेली घसरण
— ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातावर येत असलेली बंधने ही कारणे समोर येत आहेत.
शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?
यंदाच्या हंगामात सोयाबीन दराचा परिणाम आवकवर केव्हाच झाला नव्हता. दर वाढले तरी आवक ही कमीच होती आणि दर कमी झाले तरी आवक ही वाढलेली नव्हती. सोयाबीनच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांना विश्वास होता. त्यानुसार दर वाढलेही. मात्र, सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण ते प्रत्यक्षात होईल का नाही याबाबत सांगता येत नाही. पण अधिकच्या अपेक्षेत आहे ते हातून जायचे एवढे लक्षात ठेऊन सोयाबीनची विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसानही होऊ शकते असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.
संदर्भ- टीव्ही -९