हॅलो कृषी ऑनलाईन । महावितरण कडून सतत काहीना काही चुका घडत असतात. याची प्रचीती अनेकवेळा आली आहे. वाढीव वीज बिलांमुळे तर महावितरण नेहमीच चर्चेत असते. अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठविल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेतच मात्र वीज जोडणी नसतानाही तब्बल ३४ हजार रुपयांचे वीज बिल पाठविल्याची एक घटना नुकतीच समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील जंगमवाडी गावातील शेतकरी पिराजी झम्पलवाड यांच्याबाबतीत हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या शेतात अद्याप वीज पोहोचली नाही मात्र वीज पोहोचले आहे.
पिराजी झम्पलवाड यांनी आपल्या शेतातील विहिरीसाठी २०१४ साली कृषीपंपाचे रीतसर कोटेशन भरले होते. या घटनेला आता ६ वर्ष झाली आहेत मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी मिळाली नाही आहे. त्यांनी यासाठी अनेकदा महावितरण कडे फेऱ्या मारल्या तरीही त्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र एकदम ३४ हजाराचे बिल पाठवून महावितरणने धक्काच दिला असे ते म्हणतात. हे वीज बिल माफ करावे अशी मागणी करत जर हे बिल माफ झाले नाही तर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
महावितरणकडून वीज बिलाच्या बाबतीत सातत्याने काहीतरी चुका घडत असतात. मात्र वीज जोडणी नसताना वीज बिल पाठविल्यामुळे महावितरणच्या या अशा कारभाराची चांगलीच चर्चा होते आहे. आता यावर महावितरण काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.