हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना पिकांचे नुकसान झाल्यास दिलासादायक ठरते. सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानाची माहिती कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती देण्याचे आदेश
–खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे.
–या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.
–जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.
–पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबीमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे ?
–विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधिता क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स व संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे.
–नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक असेल.
–शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत द्यावी असे सांगण्यात आले आहे.
— अधिक तपशिलासाठी तात्काळ जवळच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी सपर्क साधावा.
— राज्य सरकारनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.