हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात चांगलाच जाणवतो आहे. राज्यात त्यामुळे थंडीची लाट आली आहे. निफाड, धुळे, जळगाव सह परभणीत ही पारा 5 अंशांच्या आसपास आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे. आज दिनांक 31 रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जळगावात दहा वर्षातील नीचांकी तापमान
दिनांक 30 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात 4.8 अंश सेल्सिअस तर जळगाव येथे दहा वर्षातील नीचांकी पाच अंश, उत्तर परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठात 5. 5अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया इथेही तापमानात आठवड्यांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाल्याने थंडीची तीव्र लाट आली आहे. नांदेड, परभणी ,अकोला, अमरावती ,बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा ,यवतमाळ जिल्ह्यामध्ये थंडीची लाट आली आहे.
‘या’ जिल्ह्यात थंडीची लाट राहणार कायम
पुणे वेधशाळेकडून दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील जालना,परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.
तर संपूर्ण देशाचा विचार करता पंजाब येथे नीचांकी 2.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मध्य आणि वायव्य भारतात किमान तापमानात तीन तारखेपर्यंत वाढ होण्याची तसेच त्यानंतर पुन्हा पारा घसरण्याची शक्यता आहे.