हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्याचे उत्तम करिअर व्हावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक आई वडील भरपूर कष्ट करीत असतात. पंढरपूर तालुक्यातल्या अनवलीमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या उत्तम क्रिकेट करिअरसाठी चक्क 5 एकर शेतातच जबरदस्त क्रीकरत मैदान तयार केले आहे. या शेतकऱ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने द्राक्षबाग तोडून त्यावर क्रिकेटचं मैदान तयार केले आहे.
अनवली येथे राहणाऱ्या बाळासाहेब सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश याला क्रिकेटची आवड आहे. तो गेल्या वर्षी नंदूरबार जिल्ह्याकडून 14 वर्षांखालील गटातील स्पर्धा खेळला आहे. तसंच पुण्यात त्याच्या नेतृत्वाखाली टीमनं दोन स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. अभियश लॉकडाऊनमुळे गावी परतला आहे. गावी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी नीट मैदान नाही. अभियशची ही अडचण बाळासाहेबांनी ओळखली. त्याच्या सरावात कुठेही खंड पडू नये म्हणून त्यांनी शेतात राष्ट्रीय स्तरावरील मैदान उभारण्याचे ठरवले. विशेष म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या पीच क्युरेटरनी देखील खास अनवलीमध्ये येऊन या मैदानाची पाहणी केली. त्यांनी देखील मैदानाचे काम योग्य पद्धतीने सुरु असल्याचे सांगितले आहे.
द्राक्ष बागेला केले क्रिकेट मैदान
बाळासाहेबांनी त्यांच्या पाच एकर द्राक्षाच्या शेतीमध्ये हे मैदान तयार करण्याचं ठरवलं. त्यांनी यासाठी संपूर्ण रान अडीच फूट मातीने भरुन घेतले. मुंबईहून पिच आणि मैदानावरील गवत लावण्याचे काम सध्या सुरु आहे. या मैदानात राष्ट्रीय दर्जाचे 4 पिच 2 प्रॅक्टिस पिच आणि 2 सिमेंटची पिच तयार करण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती बाळासाहेबांनी दिली आहे . सध्या अभियाशी बॉलिंग मशीनच्या साहाय्याने सर्व करतो आहे.