हॅलो कृषी ऑनलाईन : बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. बैल आणि शेतकरी यांचे नाते काही औरच असते. याच बैलाच्या मृत्यूनंतरही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रेटवडी येथील काळे कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या नंद्या नावाच्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलाच्या मृत्यनंतर दशक्रिया विधी केला. तसेच तेरावा विधी गावकरी नातेवाईकांच्या उपस्थित केला आहे. त्यामुळे हे कुटुंब आणि नंद्या बैल सध्या चर्चेत आहे.
कष्टकऱ्याने बैलाची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या बैलाचा शेवट गोड केलाय. 4 महिन्याचे वासरु ते 22 वर्षांचा सहवासात नंद्या बैलाने काळे कुटुंबाच्या सदस्य बनला.आता नंद्या बैल काळे कुटुंबाला सोडून गेलाय. या नंद्याची कृतज्ञता व्यक्त करत ज्या प्रमाणे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे नंद्या बैलाच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला. गावासह नातेवाईकांना गोडधोड जेवणाची पंगत घालत तेराव्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.
शिवराम काळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. 22 वर्ष काळे कुटुंबासोबत नंद्या ने काबाड कष्ठ केले मात्र आज बैलांच्या गोठ्यातील या बैलाची जागा रिकामीच आहे. आज नंद्या बैलाच्या जाण्याने जेवढं दुख माणसांना झालं त्यापेक्षाही अधिक दुख त्याच्या सहकारी बैलांना झालं. एकीकडे राज्यात बैलगाडा शर्यत बंदी आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आक्रमक झालाय. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी मोठी आंदोलने पेटली आहेत. असं असताना सुद्धा बळीराजा आपल्या बैलाला पोटच्या मुलासारखा संभाळ करताना पाहायला मिळत आहे.