हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा प्रतिनिधी, सकलेन मुलाणी
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने उसाची शेती केली जाते. सध्या उसाची तोडणी सूरु असून बहुतेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील चोराडे येथील शेतकरी आबासो जोती पिसाळ यांनी अथक कष्टातून ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. शेतात केलेल्या खर्चाच्या बरोबरी पेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिक वण्याची किमया साधली असुन तब्बल ३० गुंठ्यात तब्बल ९१ टनांचे उत्पादन घेतले आहे.
लागणीसाठी शेणखत व सेद्रींय खताचा वापर
गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी उसाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेत होते. त्यानंतर त्यांनी शेतीत विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ऊस शेतीचे नवनवीन तंत्र अवलंबण्यास सुरुवात केली.त्यापद्धतीने आडसाली लागणीत पारंपरिक पद्धतीने पीकपूर्व मशागत करत असताना ३० गुंठ्यांच्या शेतामध्ये आडसाली ऊस लागणीसाठी शेणखत व सेद्रींय खताचा वापर करुन साडेचार फूट सरीवर उसाची लागवड केली. खताचा बेसल डोस बरोबर आळवणी, औषध फवारणी, बाळभरणी, ड्रिप मधुन योग्य खताचे नियोजन केले.
एका उसाला सुमारे ३५ ते ४० कांड्या
त्यामुळे त्यांनी उत्पादनात आघाडी घेतली असुन नुकतीच ३० गुंठे क्षेत्रातील उसाची माण खटाव साखर कारखान्याने तोड केली. संपूर्ण उसाची काढणी केल्यानंतर ३० गुंठ्यांत ९१ टन उत्पादन मिळाले. एका उसाला सुमारे ३५ ते ४० कांड्या होत्या. त्यामुळे ३० गुंठ्यांत विक्रमी उत्पादन पाहून अनेकांनी यांचे कौतुक केले.