हॅलो कृषी ऑनलाईन : या वर्षी संत्रा ची फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सततच्या फळगळीला त्रासलेल्या तब्बल पाच शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने संत्रा बागच उपटून काढण्याचा धक्कादायक प्रकार अमरावती इथं समोर आलाय. संत्र्याची फळगळ ही हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील माधान, गोदरी पवनी नांदगाव खंडेश्वर या गावात शेतकऱ्यांनी फाळगळीच्या त्रासाला कंटाळून अख्खी बागच जेसीबीच्या साह्याने काढून टाकली आहे.
यंदाच्या आंबिया बहारातील जिल्ह्यातील संत्र्याची फळगळ ही प्रमाणापेक्षा जास्त राहिल्यानं तसंच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामार्फत फळ गळतीचे निदान आणि नियंत्रण होत नसल्याच्या कारणाने नैराश्यात शेतकऱ्यांनी संत्र भागात काढून टाकत असल्याचे विदारक चित्र अमरावती जिल्ह्यात समोर आले आहे. माधान येथील शेतकरी संजय आवारे यांची 15 वर्षांची 500 झाडांची संत्रा बाग होती. मात्र यंदा फळगळी मुळे हाती काहीच लागलं नाही. उत्पादकता खर्च मात्र लाखांमध्ये गेला. हतबल झालेल्या संजय आवारे यांनी एक हजार रुपये प्रति तास या प्रमाणात जेसीबी भाडेतत्वावर घेत आख्खी बागच उपटून टाकली आहे. या वर्षी दोन हजार क्रेट उत्पादकता अपेक्षित होती परंतु फळ गळतीमुळे तीनशे क्रेट पर्यंत उत्पादन खाली आले आहे. फळ गळतीवर उपाय योजनांबाबत सीसीआरआय आणि कृषी विद्यापीठ उदासीन आहे त्यामुळे बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं संजय आवारे यांनी सांगितलं.
याच भागातील हतबल झालेले साहेबराव जगदेव मोहोळ यांनी २००, कोदोरी येथील राजकन्या वसंतराव बोर्डे यांनी 670, रणजीत वसंतराव बोर्डे यांनी देखील हतबल झाल्यामुळे संत्रा बाग काढून टाकली आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या वरुड तालुक्यातही नैराश्यातून शेतकऱ्यांनी संत्रा बाग काढून टाकली आहे. येथील बाळू उर्फ किशोर गोळे यांनी बागेतील दहा वर्ष जुनी सहाशे संत्रा ची झाडं काढली आहेत. नांदगाव खंडेश्वर येथील दिनेश महादेव लांजेवार यांनी सव्वा एकरातील 170 झाड काढून टाकले आहेत.