हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया आल्या नंतर केंद्र सरकारनं खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान म्हणजे (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारनं बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र पूर्वीच्या जादा दरात खत विक्री होत असल्यास शेतकरी राजा सुद्धा तक्रार नोंदवू शकतो. याबाबतचे स्पष्ट आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.
शेतकऱ्यांना कमी दरात खत मिळण्यासाठी केंद्र सरकारने खत निर्मिती कंपन्यांना अनुदान वाढवून देणारी सूचना गुरुवारी 20 रोजी जाहीर केली. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही भागात खत विकत घेताना शेतकऱ्यांना जुन्या-नव्या दराच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दखल घेत कृषी आयुक्तालयाची बाजू स्पष्ट केली आहे. कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांसाठी 2 संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. खतं संबंधी तक्रारीचा तात्काळ निपटारा झाला पाहिजे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करता येणार आहे.
याबाबत बोलताना आयुक्तालय यांनी सांगितले की, ‘केंद्र शासनाने सुधारित अन्नद्रव्य आधारित अनुदान जाहीर केला आहे. यातच अन्नद्रव्याचा अनुदान वाढवण्यात आल्याने स्फुरदयुक्त खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दरात खतांची खरेदी करावी. कोणत्याही ठिकाणी सुधारित अनुदान जाहीर होण्याच्या पूर्वीच्या किमतीत खत विक्री होत असल्यास आयुक्तालयाच्या कक्षाशी संपर्क साधावा असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
येथे करा तक्रार
शेतकऱ्यांना खतांच्या किमती बाबतीत कोणतीही समस्या असल्यास कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडून दखल घेतली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान तक्रार करता येईल. यासाठी क्रमांक आहे -8446117500.
याबरोबरच आयुक्तालयाने एक टोल फ्री क्रमांक देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे त्याचा क्रमांक आहे-18002334000