हॅलो कृषी ऑनलाइन : एकीकडे भारतातील शेतकऱ्यांची सोयाबीन बाजारात येत असतानाच जगातील 12 लाख टन सोयापेंड भारतीय बाजारात येणार असल्याने सोयाबीन भावात पडझड झाली आहे. पण पडलेले भाव काही असेच राहणार नाहीत दिवाळीनंतर सोयाबीनला तुमच्या मनातील भाव मिळणार असल्याचे सूतोवाच करत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई गडबड करू नये असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे ते परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे बोलत होते .
राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल हे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात येणाऱ्या मांडेवडगाव येथे बांबू वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी 22 सप्टेंबर रोजी आले आहेत .यावेळी पाथरी शहरात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली .बांबू लागवड याविषयी ही पत्रकार परिषद त्यांनी आयोजित केली होती . दरम्यान स्थानिक पत्रकारांनी सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव पडत असल्यास संदर्भात विचारणा केल्यानंतर पाशा पटेल म्हणाले की ,पोल्ट्री उद्योगासाठी लागणारी बारा लाख टन सोया पेंड आयात झाली असून दुर्दैवाने ज्या दिवशी देशाच्या शेतकऱ्यांचा माल बाजारात येताच जगातील पेंड बाजारात येणार आहे .त्यामुळे सोयाबीन भावाची थोडी पडझड होत आहे . पण पडलेले भाव काही असेच राहणार नाहीत जगात सोयाबीन पेर्यात तुटवडा आहे . “बहुदा दिवाळी आल्याने सरकार जरा ‘अनइझी ‘ झाले असेल ” ,असे सरकारच्या निर्णयाची पाठराखण करत पुढे ते म्हणाले की ,भारत हा नॉन जीएम सोयाबीन उत्पादक देश आहे , जगामध्ये फक्त भारताच्या सोयापेंडीला किंमत राहणार आहे .त्यामुळे सोयाबीन विकायची घाई गडबड करू नका शेतकऱ्यांनो दिवाळी गेली की तुमच्या मनातले दर मिळणार आहेत असे सूतोवाच करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या सोबत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मोठी तजवीज करत सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे . त्यात हाती लागलेली सोयाबीन पदरात पडताच अपरिहार्य कारणामुळे त्याला ती विकावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन ला विक्रमी भाव मिळाला तरी तो सोयाबीन खरेदी करत साठे करणाऱ्या व्यापारी वर्गाच्या फायद्याचा ठरणार आहे हे स्पष्ट आहे. अकरा हजार रुपयांपर्यंत सोयाबीन भाववाढीचा उचांक झाल्याने सोयाबीन यंदा तारेल अशी अपेक्षा व स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा मागील दोन दिवसात मोठी पडझड झाल्याने नेहमीप्रमाणे स्वप्नभंग झाला आहे .