हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे टोमॅटो सारख्या उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एका शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थिती असताना देखील करवंदाची लागवड करून लाखोंचं उत्पादन घेतले आहे.
चिंचखेडा बुद्रुक येथील मंगेश जयवंत पाटील यांनी आपल्या १२ एकर शेतीवर करवंदाची लागवड केली आहे. एवढेच नाही तर त्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न देखील मिळाले आहे.मंगेश पाटील हे जळगाव जिल्ह्यात करवंदाची लागवड करणारे एकमेव शेतकरी आहेत. परिसरातील 200 मजूर देखील या शेतात नेहमी राबत असतात. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती पावसाळाही कमी प्रमाणात होत असल्यामुळे रब्बी, खरिपाचे पिकांनाही पाहिजे तसे उत्पन्न सध्या येत नाही. अनेक शेतकरी सध्या हवालदिल आहेत. अशातच मंगेश पाटील यांनी करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर देखील एक नवीन आशा निर्माण झाली आहे.
या करवंदांना दिल्ली आणि कोलकाता येथील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे दुष्काळ असूनही मंगेश पाटील मालामाल झाले आहेत. इतर शेतकऱ्यांनी करवंदाची लागवड करावी असे आवाहनही मंगेश पाटील यांनी केले आहे. मंगेश पाटील यांनी 8 हजार करवंदाची वृक्ष लागवड केली आहे. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव यावर येत नसून इतर शेतकऱ्यांनी याकडे वळावे, असा सल्ला मंगेश पाटील यांनी दिला.