हॅलो कृषी ऑनलाईन : संतांच्या पालखी मार्गाचे भूमिपूजन समारंभ आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पंढरपुरात होणार आहे. मात्र यापूर्वीच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग साठी संपादित केलेल्या जमिनी ला योग्य मोबदला मिळावा. या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात नितीन गडकरींच्या विरोधात निदर्शने करून कार्यक्रमाचा निषेध नोंदवला आहे.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज दुपारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यापूर्वीच माळशिरस येथील शेतकऱ्यांनी आज पंढरपुरात येऊन पालखी महामार्ग भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवून गडकरी यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत.शेतकऱ्यांच्या या दोषामुळे पालखी मार्ग भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. यावेळी बोलताना शेतकरी सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, ‘या महामार्गाच्या कामात आळंदी पासून मोहोळ पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला मात्र माळशिरसच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. येथे आधिग्रीहीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही. ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला गेला. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही काही उपयोग झाला नाही त्यामुळे आम्ही आज होणाऱ्या महामार्ग भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत’ अशी माहिती वाघमोडे यांनी दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गासाठी केंद्र सरकारने 12 हजार 294 कोटी रुपये निधी दिला आहे. या पालखी मार्गाचे भूमिपूजन आज दुपारी 3 वाजता होणार आहे. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून सहभागी होतील. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली.तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री जनरल वी के सिंह उपस्थिती राहणार आहेत. संत आणि महाराज मंडळी ना विशेष आमंत्रण दिले आहे.या कार्यक्रमासाठी 10 हजार लोक उपस्थित राहतील. एवढी बैठक व्यवस्था केली आहे.