हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी विभाग आता आगामी खरिपाच्या तयारीला लागला आहे. अमरावती विभागाची खरीप हंगाम 2022-23 ची आढावा बैठक कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली. यावेळी बोलताना कृषी मंत्राची दादा भुसे यांनी खते ,बी बियाणे यांच्याबाबतीत काळेबाजारी खपवून घेतली जाणार नाही तसेच त्याबाबत सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे त्याप्रमाणे शेतीला लागणारे पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. मेळघाट तसेच दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी खते, बी- बियाणे पोहचण्याची व्यवस्था व्हावी. खते, बी- बियाणे यांचा काळा बाजार किंवा कुठलाही गैरव्यवहार खपवून घेणार नाही. तसे आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी येथे दिला.
खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र, बियाणे नियोजन, खत पुरवठा, प्रमुख पिकांची प्रस्तावित उत्पादकता, कृषी विभागातील विविध योजना व प्रकल्पांची माहिती, पीक विमा आणि पीक कर्ज आदी विषयांचा सविस्तर आढावा घेऊन उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खरीप पिकांचे नियोजन करताना प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या विशेष धान्य पीकांचा पेरा वाढवावा. कारण कोरोना काळामध्ये पारंपारिक धान्यपिके, रानभाज्या यांच्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे, असे सांगितले.