हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. अजित पवार यांचा चार दिवसांचा दौरा बुधवारपासून सुरु झाला असून बुधवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. आज गुरुवारी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अजित पवार पुढील चार दिवसात आठ जिल्ह्यामंध्ये जाऊन पाहणी करणार आहेत.
पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विदर्भ दौऱ्यावर असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनी गावाजवळ असलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.यावेळी बोलतांना ते म्हणाले, सरकारने ज्यांची पिकं पूर्ण उध्वस्त झाली त्यांची कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कर्ज माफ करा
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी ज्यांची पिकं पूर्ण उध्वस्त झाली त्यांची कर्ज माफ करा, ज्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करा, ज्यांचं नुकसान झालं त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा सूचनाही प्रशासनाला केल्या. तसेच पूरग्रस्त भागात पूर ओसरल्यावर रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या. जिल्ह्यात पुरामुळे अंदाजे 16300 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, पंचनामे संपायला किमान दोन आठवडे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.