हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाची तयारी करत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत मान्सूनचे. भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं होतं. मात्र मान्सून वर या चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याने या वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे म्हणजेच 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदवार्ता आहे.
मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात पोहोचला असल्याचं समोर आलं होतं. सद्यस्थितीत मान्सून मालदीव आणि समोरील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनची हीच गती कायम राहिल्यास केरळमध्ये सोमवारी(३१) मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आजही देशातील शेतकरी हे मान्सून वरील पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळेच खरिपाच्या लागवडीकरिता मान्सून हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
यास चक्रीवादळाचा परिणाम
दर वर्षी मान्सून हा एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. या वर्षीदेखील हवामान विभागाने एक जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र या चक्रीवादळाच्या परिणामामुळे मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
‘या’ तारखेला महाराष्ट्रात आगमन
सध्या मान्सूनच्या आगमनाचासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ९ ते १० जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या बीबीएम ६ मिलिमीटरच्या तुलनेत 2021 मध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्काय मेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भागातील काही भागात संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.