हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आशियातील सर्वात मोठी असणारी नाशिक येथील लासलगाव बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता लासलगाव बाजार समितीचे व्यवहार सुरु ठेवण्यात आले आहेत. 24 मे पासून बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं पालन करत बाजार समिती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या कांदा लिलाव पूर्ववत होत आहे. कांद्याला 2045 इतका भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नाशिक मध्ये बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊन नंतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. कांद्याला बुधवारी 2045 इतका भाव मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. कांदा लिलाव व्हावा म्हणून शेतकरी बाजार समित्यांमध्ये माल घेऊन येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या बाजार समिती बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास हजारोंच्या संख्येने शेतकरी भाजीपाला विक्रेते व नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसताहेत. यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग,मास्क करोना नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतमालासह प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली होती.