हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील अनेक पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. पाणी घडात राहिल्यानं आता कुजीने हे घड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत.
काल(१३) सायंकाळी पंढरपूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळं द्राक्ष बागांना फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, खर्डी परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. द्राक्ष बागेत माल कमी असताना आता या पावसानं झाडांना लागलेला फुलोरा गाळून पडू लागला आहे. याशिवाय पाणी घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. हे पाणी घडात राहिल्यानं आता कुजीने हे घड पडणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या द्राक्ष बागांना दवण्या आणि भुरीपासून वाचण्यासाठी पुन्हा हजारो रुपयांची फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळं बळीराजा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी विविध कारणाने संकटात सापडत आहे. त्यामुळं अडचणीत असणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेत येऊन सरसकट पंचनामे करावेत. तसेच शासनानं नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.