हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा परिसरात रानगवे व इतर वन्य प्राण्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. ऐन तोडणीस आलेल्या स्ट्रॉबेरी फळाचे तसेच रोपांचे आतोनात नुकसान होत आहे. सध्या कोरोना आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी आता तोट्यात आला असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. बदलत्या वातावरणाने स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे.
विलास पवार यांच्या एक ऐकरावरील स्ट्रॉबेरीचे तसेच दोन एकर गव्हामध्ये रान गव्यानी हैदोस घातला आहे. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतक-यांचे होणारे नुकसान थांबवावे, तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी शेतक-यांनी केली आहे.
याबाबत बोलताना कासवण येथील शेतकरी विलास पवार यांनी सांगितले की, मी माझ्या शेतात गव्हाचे आणि स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. पण रानडुक्कर आणि गव्यांनी गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. एवढेच नाही तर स्ट्रॉबेरी पिकाचे देखील मोठे नुकसान वन्य प्राण्यांनी शेतात घुसून केले आहे. याबाबत एक दोन वेळा वन विभागाला पत्र देऊनही दाखल घेतली गेली नाही. तरी याबाबतची दखल घेऊन नुकसानभरपाई दयावी आणि प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.