हॅलो कृषी ऑनलाईन :गेल्या काही आठवड्यांपासून गायब असलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्याने बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. मात्र आता राज्यातलया बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
३० ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,१५° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यासाठी IMD ने खालील प्रमाणे इशारे पुढच्या ३,४दिवसासाठी दिलेले आहेत.काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे,उत्तर कोकणात पण @RMC_Mumbai pic.twitter.com/e8tHRpwd6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021
31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार
छत्तीसगड राज्यावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस
उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट
मराठवाड्यात मंगळवारी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर लातूर आणि उस्मानाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.