हॅलो कृषी ऑनलाइन : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार चार गुरुवारपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतीचे रूपांतर तळ्यात
निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत. कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा – अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे.
नागपूर विभागात यावर्षी जुलै महिन्यातच सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सततचा पाऊस यामुळे शेतपिकांचे, पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने अशा गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. काल गुरुवारी देखील या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.