हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यात चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा व पाण्याअभावी माना टाकणाऱ्या पिकांना जीवनदान देत तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले असून बुधवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. यावेळी तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झालीयं .
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये 17 ऑगस्ट दुपारी 2 वा.पासून झालेल्या जोरदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान जिंतूर तालुक्यातील सावंगी महसूल मंडळांमध्ये व पाथरी तालुक्यातील पाथरी व हादगाव महसूल मंडळात यावेळी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी 39 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 649.3 मिलिमीटर पाऊस नोंद झालीयं .
गोदावरी नदी पात्रात पाण्याची आवक वाढल्याने ढालेगाव , तारूगव्हाण व मुद्गल उच्च पातळी बंधाऱ्याची दरवाजे उचलण्यात आली असून नदीपात्रात सकाळी 7 वा .पासून 16 हजार 648 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे .या पाठोपाठ येणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील खडका व पालम तालूक्यातील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यांची दरवाजे उघडण्यात आली असून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गोदावरी नदी पात्रात जालना जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढल्याने बुधवार 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. जिल्ह्याच्या सीमेवर पहिला असणाऱ्या व पाथरी तालुक्यात येणार्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे गेट क्रमांक 10 व 6 उचलत 16 हजार 84 क्युसेकने विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. तर तारूगव्हाण व मुद्गल उच्च पातळी बंधाऱ्यामधून अनुक्रमे13 हजार 105 व 17 हजार 648 क्युसेक पाण्याचा विसर्ग सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आला होता .