हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने आपला पहिला टप्पा पार केला असून आता मान्सूनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. पण पुढे काय होणार ? हा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींसह शेतकऱ्यांच्या मनात आहे. याबाबत हवामान खात्याकडून खुलासा करण्यात आला आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उर्वरित दोन महिन्यांमध्ये सरासरी एवढाच पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे दरवर्षी परतीचा होणारा पाऊस यंदा मात्र, जुलै महिन्यातच झाला काय असे चित्र आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत 94 ते 100 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे.
हवामान खात्याकडून दिलासादायक अंदाज
जून महिना पूर्ण कोरडा गेला, जुलै मध्ये दमदार पाऊस झाला आता सध्या पावसाची उघडीप असल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. कारण संपूर्ण वर्षाचे नियोजन हे चर महिन्यात पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. पण आता हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे. कारण उर्वरित काळात अतिवृष्टी, सततची ऱिमझिम असे चित्र नाही तर केवळ सरासरीच्या तुलनेत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंदाज जर खरा उतरला तर खरिपाची अपेक्षा कायम राहणार आहे.
२० दिवसात सरासरीच्या दुप्पट पाऊस
जूनच्या अंतिम टप्प्यात पेरण्या आणि 1 जुलैपासून सुरु झालेला पाऊस हा 20 जुलैपर्यंत कायम होता. या पावसाने केवळ सरासरीच ओलांडली नाहीतर पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. जुलैच्या 20 दिवसांमध्येच सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला होता. याचा सर्वाधिक फटका खरिपातील पिकांना बसलेला आहे.