गुलाब चक्रीवादळाचा परिणाम पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण करण्यात आले आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ आज धडकू शकतं आणि याचा परिणाम महाराष्ट्रही होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर, विदर्भासह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम म्हणून काल सोलापुरात जोरदार पाऊस बरसला तसाच मराठवाड्यात, विदर्भात सुद्धा मोठा पाऊस झाला आहे.

‘गुलाब चक्रीवादळ’ अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते . भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की ‘गुलाब’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे किनारपट्टी भाग पूर्णपणे तयार आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुलाब वादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पुढील तीन तासात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मंगळवारी पावसाचा जोर वाढणार

हवामान खात्याने सोमवारी पुण्यासह नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांना सोमवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी, रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!