हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनला केवळ ३०००-५००० पर्यंत दर मिळत होता. मात्र दिवाळीनंतर चित्र बदलत गेले आणि सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर ७०००च्या वर गेला मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर आज बुधवारी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना लातूर कृषी उत्पन्न बाजरा समितीत सोयाबीनचे दर ६१०० वर स्थिरावले आहेत. त्यामुळे तूर्तास शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे
–आतापर्यंत सोयाबीनच्या दराबाबत सर्वकाही पोषक होते मात्र, आता सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
–कोरोनाच्या नविन विषाणूमुळे निर्यातीस अडचणी निर्माण होत आहेत.
–या सर्व बाबींचा विचार करुन आता शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक न करता गरजेप्रमाणे विक्री करणे आवश्यक आहे.
–गतवर्षीप्रमाणे सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, सध्याचे वातावरण पाहता सोयाबीन विक्रीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
केवळ 9 हजार पोत्यांची आवक
दरम्यान बुधवारी लातूरच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 9 हजार पोत्यांची आवक झाली होती. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केल्यानेच दर वाढला होता. पण सध्या जागतिक बाजारपेठेतील वातावरण पाहता शेतकऱ्यांनी आहे त्या दरामध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे फायद्याचे राहणार आहे. ऐन हंगामामध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये 50 ते 60 हजार पोत्यांची आवक असते यंदा मात्र, सुरवतीपासूनच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या साठवणूकीवर भर दिला होता. त्यानुसार आता दर आहे. योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर भविष्यात कवडीमोलाने सोयाबीन विक्रीची नामुष्की येऊ नये म्हणजे झालं
संदर्भ टीव्ही ९