हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांकडून शिंदे सरकारला सतत धारेवर धरण्यात येत होते मात्र आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याबरोबरच पंचनाम्यासाठी विलंब होत असल्यामुळे मोबाईल ऍप द्वारे यापुढे पंचनामा केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
2 हजार 400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र
झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक 2 हजार 400 महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल, त्यामुळं विमा दावे वेगाने निकाली काढता येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. गोगलगाय, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान
पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला सूचना देण्यात येतात. तसेच कृषी कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना, अर्ज स्वीकारले जातील. हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल, असेही शिंदेंनी सांगितले.