हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्री अब्दुल सत्तर सध्या विदर्भ मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत. तेथील अतिवृष्टीग्रस्त भागाला ते भेटी देत आहेत. यादरम्यान शेतपिकांच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील
येत्या आठ दिवसांत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते यवतमाळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणं महत्त्वाचे आहे.
अमरावती येथे बोलताना कृषी मंत्री म्हणाले की, ‘आत्महत्या झाल्यावर मदत देण्यापेक्षा आत्महत्या होऊच नयेत, यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषिमंत्री म्हणून मी स्वतः आमच्या कृषी विभागाचे अधिकारी, आयुक्त, जिल्हाधिकारी आम्ही सर्व जण येणाऱ्या काळात एक दिवस शेतकरी आणि त्याच्या परिवारासोबत घालवणार आहोत. ‘ असे सत्तार म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील दौऱ्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कोटंबा कोल्ही आणि सेलसुरा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला,शेतपिकांच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नुकसानीचा अहवाल ७ दिवसात पाठवा…
पुढील सात दिवसांत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील पीक नुकसानीचा अहवाल पाठविण्यात यावा. सर्वे करताना संवेदनशीलतेने करावा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी, अधिकारी व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना त्यांनी हे निर्देश दिलेत.