हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आता आगामी खरिपाची शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. कारण रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय चांगले बियाणे देखील उपलब्ध व्हावेत याकरिता शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. कृषी विभाग देखील आगामी खरिपाच्या जोडणीमध्ये व्यस्त आहे. आज औरंगाबाद कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम खरीप हंगाम २०२२ पुर्व नियोजनाबाबत जालना येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांची विभागीय खरीप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे खते आणि बी-बियाणे यांचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी कृषी विभाग व स्थानिक प्रशासनाने प्राधान्याने काम करावे तसेच बियाणांचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती दादा भुसे यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. सदर बैठकीस आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे, माजी मंत्री श्री.अर्जुनजी खोतकर,कृषि सचिव श्री.एकनाथजी डवले, आयुक्त श्री.धिरजकुमार उपस्थित होते.
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा मनाला जातो. शिवाय प्रमुख अन्नधान्याचा पुरवठा हा खरीप हंगामातूनच होतो. जो पुढे वर्षभर वापरला जातो. मात्र मागच्या काही वर्षांमध्ये बियाणे , खते यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना आणखी अर्थीक नुकसान होते. मात्र यंदाच्या वर्षी बियाण्यांच्या काळाबाजारवर कृषी विभाग लक्ष ठेऊन असणार आहे.