हॅलो कृषी ऑनलाईन : युक्रेन आणि रशिया या दोघांच्या मध्ये चाललेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झालाय. तेल, सोने , इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह आता खतांचा वर देखील परिणाम होतो आहे. रशिया आणि बेलारुस हे भारताला खतांचा पुरवठा करणारे महत्त्वाचे देश आहेत. मात्र रशियाने यूक्रेन वर हल्ला केला आणि सर्वच गणित बदलली. रशिया मार्गे होणारी वाहतूक थांबली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी लागणारा खतांचा पुरवठा सुरळीत होईल का याची चिंता लागून आहे. एकीकडे रशिया मार्गे होणारी वाहतूक थांबली असताना अमेरिकेसह महत्त्वाच्या देशांनी या दोन्ही देशांना आर्थिक निर्बंध लावलेत. त्यामुळे खत निर्यात ठप्प झाली आहे. भारत युरिया, पोटॅश, एनपीके ,डीएपी या खतांची आयात करतो. यापैकी पोटॅशसाठी भारत हा पूर्णपणे रशिया आणि युक्रेन वर अवलंबून आहे. मात्र देशाला खतांचा पुरवठा होण्यासाठी भारतानं इतर देशांकडून खत आयातीचा निर्णय घेतला आहे. भारत इस्त्राईल, कॅनडा आणि जॉर्डन या देशांकडून पोटॅश खत आयात करणार आहेत. तर युरियाचा मर्यादित वापर असे धोरण राबवून युरियाचा वापर पाच टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरवले आहे.
सेंद्रिय खते आणि रसायन मंत्री मनसुख मंडविया यांनी खते उपलब्ध असल्याचा सांगितले. यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी साठा देशात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय खरिपासाठी साधारण तीनशे लाख टन खतांची गरज आहे. सरकारने या खतांची तजवीज ही सुरू केली आहे असा मंडविया यांनी सांगितले आहे. खरीप हंगामासाठी भारताला पोटॅशची दर वर्षी 40 ते 50 लाख टनांची गरज असते. भारत संपूर्ण गरज आयातीतून पूर्ण करतो. रशिया आणि बेलारुस हे मुख्य निर्यातदार यांच्याकडून येणारा खतपुरवठा आता बंद झाला आहे. त्यामुळे भारत आता इतर देशांकडून पोटॅशची आयात वाढवतोय. आता कॅनडा जॉर्डन आणि इस्त्राईल या देशांकडून आयात होईल. इंडियन पोट्याश लिमिटेड ही कंपनी कॅनडा कडून बारा लाख टन पोटॅश आयात करेल तसेच इस्त्राईल कडून सहा लाख टन आणि जॉर्डन कडून तीन लाख टन पोटॅशची आयात होणार आहे. असं जाणकारांनी सांगितला आहे. खरिपात खतांची टंचाई भासणार नाही कारण जून पूर्वी ही खते भारतात आयात होईल असं जाणकारांचं मत आहे.
सेंद्रिय खतांचा वापर
शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात मात्र त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. शिवाय नैसगिर्क शेतीला सरकार प्रोत्साहनही देत आहे. रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होत असताना सेंद्रिय खते एक चांगला पर्याय आहे.