कोल्हापूर | गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यांना बसला होता. तर, यावर्षी देखील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आधीच सतर्क राहून मागील वर्षातून धडा घेत खबरदारी घेतली होती.
यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी व कोयना धरणातून विसर्ग थांबला होता, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. तर, आता गेल्या ३ ते ४ दिवसात पावसाने पुन्हा जोर धरला असून राज्यातील धरणांच्या साठ्यात प्रचंड वाढ होत आहे. काल, राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे ७ हजार क्युसेक वेगाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सद्या ७८ बंधारे पाण्याखाली गेले असून नदीची पाणी पातळी ३८ फुटांवर गेली आहे. तर, पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट एवढी असून धोक्याची पातळी ४३ फूट आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून तब्बल ५० हजार क्युसेकहुन अधिक पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळी मध्ये देखील झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कृष्णा नदीची पाणीपातळी ३१ फुटांवर गेली असून चांदोली धरणातून देखील विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सखल गावांमध्ये पाणी शिरू शकते.