हॅलो कृषी ऑनलाईन । कांद्याचे दर गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत आहेत. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर १ ते २ हजार ८०० रु इतका राहिला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर सध्या ५० रु किलो असा आहे. मागच्या वर्षी याच काळात कांद्याचा दर १४५० रु प्रति क्विंटल असा होता. यावर्षी कांद्याचा दर प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार रु असा राहिला आहे. ई-नाम नुसार राज्यातील लोणंदमध्ये १ मार्चला कांद्याचा दर ३६०० रुपये क्विंटल होता. तर पंढरपूरमध्ये कांद्याचा दर ३२०० रुपये इतका होता. तर दोन्ही बाजारपेठांमध्ये कांद्याचा कमाल दर ४ हजार रुपये क्विंटल राहिला आहे. याचे कारण सांगत असताना महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी गेल्या वर्षाच्या तलनेत कांद्याची आवक निम्मी असल्याची माहिती दिली आहे. कांद्याचे दर वाढण्याची कारणे काय आहेत याबद्दल जाणून घेवूया.
यावर्षीच्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकविलेल्या कांद्याच्या जवळपास ४०% कांदा खराब झाला आहे. एकरात १२० क्विंटल होणाऱ्या कांद्यामधील ४५ क्विंटल कांदा खराब झाला आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेत आणला आहे. मात्र त्यांच्या नुकसानामुळे दर जास्त लावले जात आहेत. राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाच्या एका अहवालात शेतकऱ्यांना एक किलो कांदा उत्पादित करण्यासाठी ९.३४ रु खर्च येतो अशी माहिती दिली आहे. भारत दिघोळे यांनी सांगितल्यानुसार लाल कांद्याला २४ ते ३० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. रब्बी हंगामामध्ये सरासरी १८ ते २४ रु दर मिळतो.
सध्या कांद्याला चांगला दर मिळतो आहे मात्र नाशिक, पुणे, धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जानेवारी महिन्यातील ७ ते १० तारखेदरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला होता ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कांद्याचे भाव वाढत आहेत.