हॅलो कृषी ऑनलाइन : मागील आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो आहे . याचा फटका शेतकऱ्यांना तर बसतो आहेच मात्र सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे वीज पडून मेंढपाळ आणि त्याच्या दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील नरळे वस्ती परिसरातील माळरानावर रामचंद्र पांडुरंग गडदे हा मेंढपाळ अंगावर वीज पडून जागीच ठार झाला.तर सुमारे दहा मेंढ्या मरण पावल्या आहेत. ही गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नांगोळे येथील रामचंद्र गडदे व इतर तीन चार मेंढपाळ मेंढ्या करण्यासाठी नरळे वस्ती परिसरातील माळरानावर गेले होते.पावसाचे वातावरण दिसल्याने हे चारही मेंढपाळ मेढ्या घेवून घरी परत येत होते.जत रस्त्याच्या लगत असलेल्या नरळे वस्ती परिसरातील माळरानावर आले असता विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला.
याचवेळी रामचंद्र गडदे यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाले आहेत. मयत गडदे यांचा भाचा सचिन हुबाले यांनी गडदे यांना जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश दोपारे यांनी पोलिस ठाण्यास माहिती दिली.पोलिस हवालदार विनोद चव्हाण व सुहास मोहिते यांनी पंचनामा केला. पोलिस ठाण्यात नोंद झाली असून .अधिक तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र गडदे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.