हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , वन्य प्राण्यांमुळे बऱ्याचदा पशुपालकांची जनावरे दगावल्याच्या घटना समोर येतात. अशा घटनांमध्ये वाढ होताना देखील दिसत आहे. यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? अशा घटना घडल्यास तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळते . हल्ली बिबट्या ,जंगली कुत्री ,तरस यांच्या हल्ल्यात जनावरे दगावल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजच्या लेखात आपण अशा घटना घडल्यास नुकसान भरपाई किती मिळते ? त्याकरिता कोणते निकष पळाले जातात याची माहिती करून घेऊया…
महसूल व वनविभागाने ११ नोव्हेंबर २०१६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, रानकुत्रे यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या हल्ल्यात गाय-म्हैस, शेळी-मेंढी तसेच बैल यांचा मृत्यु झाल्यास पशुपालकांना भरपाई मिळू शकते. पण त्यासाठी पशुपालकांनी काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.
हे नियम पाळावे लागतील
–पशुपालकांनी जनावर मृत्यु पावल्यापासून ४८ तासांच्या आत नजीकच्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
–जंगली प्राण्याने ज्या ठिकाणी जनावर मारले, त्या ठिकाणाहून वनाधिकारी येईपर्यंत जनावरांचे शव हलविता कामा नये.
–जनावराचा ज्या ठिकाणी मृत्यु झाला असेल किंवा जखमी झाला असेल त्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतरापर्यंत विष घालून कोणत्याही वन्य प्राण्याचा मृत्यु झालेला नसावा.
–वनाधिकाऱ्याला कळविल्यानंतर वन अधिकारी त्याठिकाणी येऊन पंचनामा करतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातच पाळीव प्राणी जखमी झाल्याची खातरजमा करतो. त्यानंतर सर्व निकष तपासून किती रक्कम मिळेल हे ठरवतो.
किती मिळते रक्कम ?
गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यु झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा २५,००० यातील कमी असणारी रक्कम मिळते. या उलट अपंगत्व आलेले असल्यास बाजार किमतीच्या ५० टक्के म्हणजे ७५०० रुपये पशुपालकांना मिळू शकतात. शेळी, मेंढी यांचा मृत्यु झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा ६००० रुपये यातील कमी असणारी रक्कम मिळू शकते.