हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून कोरडाच गेला मात्र जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. एकीकडे पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी बीड जिल्ह्यात मात्र वेगळंच चित्र आहे. बीड जिल्ह्यात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उगवलेले सोयाबीन पूर्णतः नष्ट झाले आहे. इतरही पिकांना गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका बसतो आहे. त्यामुळे “कृषी आणि महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करुन राज्य सरकारने संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी” , अशी मागणी माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानग्रस्त अंबाजोगाई तालुक्याचा दौरा धनंजय मुंडे यांनी १० जुलै रोजी केला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे आदींकडूनही माहिती घेतली असून कृषी आणि महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन त्याचा अहवाल राज्य सरकारला कळवावा. आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप नाही
पाऊस चांगला पडत असला तरी बीडमधील शेतकरी शंखी आणि अन्य प्रकारच्या गोगलगायीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झाले आहेत. नव्याने उगवलेली रोपे गोगलगायी नष्ट करीत आहेत. कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन-कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या परंतु त्याला खूप उशीर झाला होता. ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे सहलीवर होते आणि नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेलं नाही. पेरणी करुन 100 टक्के नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणं आणि दुबार पेरणी करणं, असं दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांसमोर असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.